भाई-व्यक्ती की वल्ली हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीपासूनच त्याबाबत आकर्षण होते. कारण पुलंच्या महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्त्वावर बेतलेला हा चित्रपट. पण हा चित्रपट पाहिला आणि पुलंची नवी ओळख महेश मांजरेकर यांनी करून दिली, हे प्रकर्षाने जाणवले. आकाशाला भिडणारे व्यक्तिमत्त्व पुलंची १९७७ च्या साहित्य संमेलनानंतर कराडमध्ये काढलेली अंत्ययात्रा आणि त्यानंतर पुलंची काही चूक नसताना केलेल्या अतिरेकी कृतीचे दर्शन यशवंतराव चव्हाणांच्या शहरात घडल्यानंतर त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणखी बदलला होता. एक ऋषितुल्य अशा या महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्त्वाबद्दल कोणी काही बोललं तर कसं सहन करणार. पण त्यांच्या साहित्यातून ते भरभरून भेटत राहिले. आजही अनेकदा त्यांची आठवण होते. त्यांची पुस्तकं, त्यांचे शब्द, त्यांनी निर्माण केलेली पात्रं, त्यांचं आभाळाएवढं मोठेपण आठवत राहतं. पण जेव्हा प्रत्यक्ष चित्रपट पाहिला तेव्हा चित्रपट म्हणून समाधान मिळाले, पण पुलंची जी प्रतिमा उभी केली त्याने निराशाच पदरी पडली.नव्या पिढीला आणि इंग्रजी शाळेत शिकणा-या मुलांनी पुल नेमके कसे होते हे आवर्जून दाखवायला आलेले पालक हा चित्रपट पाहायला आले होते. त्यामुळे आनंद होत होता. पण ज्यांना पुल माहीत नाहीत अशा प्रेक्षकांना काय वाटेल हा चित्रपट पाहून हा विचार आला आणि अंगावर काटाच आला. असे होते पुल? मांजरेकरांनी काय दाखवावे याचे भान न ठेवता पुलंची वेगळीच ओळख करून दिली हे जाणवले.म्हणजे रत्नागिरीला गेल्यावर सावर्डेकर वकिलांकडे केवळ स्कॉच मिळते म्हणून हावरटपणे जाणारे वसंतराव देशपांडे आणि पु. ल. देशपांडे हे विचित्र वाटते. शिवाय तिथे पिऊन झाल्यावर पुन्हा कर्वे अण्णांकडे प्यायला बसणारे भाई. म्हणजे ही उत्तुंग व्यक्तिमत्त्व दारूडी होती हेच यातून दाखवले गेले.त्यानंतर भीमसेन जोशी आणि वसंतराव यांना भेटायला जाणारे पुल हळूच शर्टखाली लपवलेली आणि पार संपलेली दारूची बाटली बाहेर काढतात, असा एक प्रसंग चित्रपटात आहे. म्हणजे महाराष्ट्रातली ही दिग्गज मंडळी केवळ पिण्यासाठीच भेटत होती की काय? असा प्रश्न पडतो. शिवाय भारतरत्न भीमसेन जोशी यांच्या तोंडी, एवढय़ाने घसा तरी ओला होईल का? असेही एक वाक्य टाकण्यात आले आहे. भीमसेन जोशींबद्दल लोकांना माहिती होते, पण पुल हे असेच दारूबाज होते ही ओळख मांजरेकरांनी दिली, ती न पटणारी आहे. कलाकार हे मनस्वी असतातच. त्यांच्या विक्षिप्तपणाच्या अनेक गोष्टी असतात. पण अशा गोष्टी ठळकपणे अधोरेखित करून त्या पडद्यावर दाखवून दिग्दर्शकाला नेमकं काय साध्य करायचं होते हे अनाकलनीय आहे.या चित्रपटालील पैसा वसूल प्रसंग म्हणजे चित्रपटाच्या शेवटी कुमार गंधर्व, वसंतराव देशपांडे आणि भीमसेन जोशी यांची एक अप्रतिम मैफल दाखवली आहे. पण या मैफलीचा उगमही असा दाखवण्यात आला आहे की, रात्री दारू मिळत नाही म्हणून ती हमखास मिळेल, असं ठिकाण म्हणून भीमसेन, भाई आणि वसंतरावांना घेऊन चंपुताईच्या घरी जातात. म्हणजे दारूसाठी ही मंडळी काहीही करत होती, हेच दिग्दर्शकांना दाखवायचं आहे का?सुनीताबाई आणि पुल यांच्या सहजीवनाचे अतिशय समृद्ध असे कंगोरे आहेत. भाईंच्या जडणघडणीत सुनीताबाईंचा मोलाचा वाटा आहे. प्रसंगी अनेकांचा रोष पत्करून सुनीताबाईंनी भाईंच्या कर्तृत्वाला आकार देण्याचं काम केलंय. हे पैलू चित्रपटात कुठेच जाणवत नाहीत. अंमलदारचं लिखाण पुल एका रात्रीत संपवतात हा प्रसंग आहे. पण तेही सुनीताबाईंनी लिहिल्याशिवाय सिगारेट देणार नाही असं ठणकावल्यामुळे असं दाखवलंय. उलट लिखाणाला बसलेले भाई सिगारेट आणण्यासाठी उठले की पुन्हा बसायला आळस करतात हे लक्षात आल्यावर सुनीताबाईंनी स्वत: सिगारेटी विकत घेऊन भाईंना देत असल्याचे ‘आहे मनोहर तरी’मध्ये त्यांनी लिहिले आहे. रात्री भाई कितीही उशिरा घरी आले तरी तेव्हा दाराची बेल वाजवण्याआधीच सुनीताबाई दार उघडत असत. त्यांच्या येण्याची चाहूल सुनीताबाईंना लागत असे. पुल हे लहान मुलासारखे असल्यामुळे त्यांना सांभाळायचे, तर आणखी दुसरे मूल नको असा विचार करून अॅबॉर्शन करून घेणा-या सुनीताबाईंचा प्रसंग फार भावनीक आहे. पण त्याने उंची गाठली नाही आणि सुनीताबाईंच्या व्यक्तिरेखेवरही अन्यायच झाला. एकूणच धांदरट आणि बायकोला घाबरणारा अशी पुलंची प्रतिमा निर्माण केली आहे, जी सुनीताबाईंसाठीसुद्धा अन्यायकारक आहे. आईसमोर सिगारेट ओढणारे भाई, रत्नागिरीला गेल्यावर घरच्यांशी न बोलता थेट वाडीमध्ये सिगारेट ओढायला जाणारे भाई दाखवून पुल हे कसे स्मोकर होते हे यात छान दाखवले आहे.पी. जी. वुडहाऊस वाचणारे पुल, त्यांचे मराठी व्यतिरिक्त, बंगाली, इंग्रजी भाषांवरही प्रभुत्व होते; परंतु कॉलेजमधे त्यांना इंग्रजी बोलताना अडखळताना दाखवले आहे. बा. सी. मर्ढेकरांबरोबरचे प्रसंगही फारच पोरकट पद्धतीने दाखवले गेलेत.अर्थात हा केवळ पहिला भाग आहे. खरं तर ज्यावेळी एखादी कलाकृती दोन भागांत दाखवली जाते तेव्हा ते दोन्ही भाग एक कलाकृती म्हणून स्वतंत्र आणि परिपूर्ण असणे अपेक्षित आहे. चित्रपट म्हणजे दूरदर्शनवरची मालिका नव्हे. इथेही चित्रपट असाच अर्धवट सोडून देण्यात आला आहे आणि चित्रपटात निवेदकाच्या रूपात कुठेही नसणारे पुल केवळ पुढचा भाग बघायला या, एवढं सांगण्यापूरतं शेवटी निवेदकाच्या रूपात येतात.खरं तर मराठी मनावर अधिराज्य करणारे पु. ल. देशपांडे ऊर्फ भाई. लेखक, नाटककार, अभिनेता, गायक, पेटीवादक अशा विविधांगी व्यक्तिमत्त्वाचे पुल, कलासक्त पुल, कुठलाही गाजावाजा न करता मोठा दानयज्ञ चालवणारे पुल, अनेक साहित्यिकांना प्रेरणा देणारे पुल, प्रसंगी राजकीय भूमिका घेणारे पुल, देश विदेशात प्रवास करून त्याबद्दल उत्तम साहित्य लिहिणारे पुल, एक असामान्य असं व्यक्तिमत्त्व. त्यांच्या आयुष्यावर चित्रपट पाहताना काही किमान अपेक्षा होत्या. त्याही पूर्ण होऊ शकल्या नाहीत.
Saturday, January 12, 2019
‘भाई’ने पुलंची नवी ओळख दिली
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment