Sunday, July 24, 2016

तर उत्तर प्रदेशात शिरकाव मिळणे कठीण


  • दोन वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. त्या वेळी सत्ताधारी बनलेला भाजप पक्ष संपूर्णपणे त्यांच्या व पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या नियंत्रणात आहे व त्यापुढेही राहील, असे चित्र निर्माण झाले होते. पण कालांतराने तो फुगा फुटला. किंबहुना बोलघेवड्यांची टिवटिव फार वाढल्याने ही टिवटिव थांवण्यातच मोदींना आपला वेळ वाया घालवावा लागत आहे असे दिसते आहे. 
  •      याचे ताजे उदाहरण म्हणजे बसपच्या प्रमुख मायावती यांच्याबद्दल उत्तर प्रदेश भाजपचे नेते दयाशंकर सिंह यांनी जे अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन अपशब्द वापरले तो प्रकार. वास्तविक त्याचा समाजातील सर्व सुबुद्ध लोकांनी तीव्र निषेधच केला आहेे. दयाशंकर सिंह यांनी जी सडकी आणि मूर्खासारखी विधाने केली, त्याच्यामुळे संसद व सार्‍या देशभरात गदारोळ माजला यात काहीच नवल नव्हते. पण भाजपकडून हे अपेक्षित नव्हते.
  • वाटेल ते बरळण्यात लालू यादव, समाजवादी पक्षाचे नेते, एमआयएम किंवा केजरीवाल यांच्यासारखे नेते नेहमीच आतूर असतात. पण हे भाजपच्या नेत्यांकडून झाले म्हणून जास्त आश्‍चर्य होते. कारण विरोधी पक्षाच्या असल्या तरी एका मोठ्या महिलेबद्दल केलेले ते वक्तव्य होते. त्याची दयाशंकर सिंहांना शिक्षा मिळाली असली तरी बोललेले शब्द मागे घेता येत नाहीत. तो कलंक दयाशंकरना नाही तर पक्षाला लागला आहे हे भाजप नेत्यांनी लक्षात घेतले पाहिजे.
  •          उत्तर प्रदेशात २०१७ मध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. तिथे आपल्याविरोधात कोणताही अडचणीचा मुद्दा प्रचारात येऊ नये म्हणून भाजप विलक्षण काळजी घेत आहे. अशातच दयाशंकर सिंह बरळल्याने बसप व अन्य विरोधकांच्या हाती भाजपला नामोहरम करण्याकरिता अत्यंत प्रभावी मुद्दा मिळाला. भाजप हा महिलांचा आदर राखणारा पक्ष नाही हे बिंबवायला फार सोपे झाले आहे.
  •      बसपच्या मायावती आता माजी मुख्यमंत्री असल्या तरी उत्तर प्रदेशातील दलित व सवर्णांतील मोठा वर्ग आजही त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. भाजप हा दलितविरोधी व महिलाहितविरोधी आहे, अशी काळी प्रतिमा निर्माण करण्यास दयाशंकर यांच्या वक्तव्यांनी आयते कोलीतच मिळाले आहे. याचा फायदा मायावतींशिवाय सगळेच पक्ष घेतल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे लोकसभेत जरी उत्तर प्रदेशाने भरभरून माप टाकले असले तरी विधानसभेत तसे होईल हे सांगता येत नाही.
  •       दयाशंकर सिंह यांची आता भाजपने पक्षातून हकालपट्टी करून बोळवण केली असली तरी ही कारवाई उत्तर प्रदेशच्या निवडणुकांवर डोळा ठेवूनच इतक्या त्वरेने करण्यात आली आहे हे दिसून येते. उत्तर प्रदेशच्या पूर्व भागामध्ये दयाशंकर सिंह यांचा काही प्रमाणात प्रभाव आहे. या भागातील ठाकूर व भूमिहार मतदारांना जवळ आणण्याचा अंतस्थ हेतू ठेवून भाजपने त्यांची गेल्याच आठवड्यात उत्तर प्रदेशच्या उपाध्यक्षपदी नेमणूक केली होती. बलिया मतदारसंघातून भाजपतर्फे विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारीही मिळण्याची शक्यता होती. पण दयाशंकर सिंह यांनी आपल्या कारकीर्दीवर स्वत:च्या हातानेच बोळा फिरवून घेतला. ते जे बोलले त्यातून उत्तर प्रदेशातील राजकारणामध्ये मुरलेली सरंजामदारी व महिलांविषयी असलेला अत्यंत कोता दृष्टिकोन याचेच दर्शन झाले. 
  •       उत्तर प्रदेशातील विद्यार्थी चळवळींतून भाजपला जे काही नेते मिळाले त्यामध्ये दयाशंकर सिंह यांचा समावेश आहे. त्यातही ते राजनाथ सिंह यांच्या खास विश्वासातले व रा. स्व. संघाच्या वर्तुळातही लोकप्रिय. पण हा माणूस स्वत:च्याच प्रेमात होता. याच वृत्तीने त्यांचा घात केला. त्यामुळे ही चूक कशी सुधारून काढायची ही भाजपपुढची डोकेदुखी आहे. 
  •        उत्तर प्रदेशात दलित मतदारांना आपल्या बाजूने मोठ्या प्रमाणावर वळवल्याची नीती अमित शहा यांनी अवलंबली होती. बसप व समाजवादी पक्षाला कोंडीत गाठून निवडणुका जिंकण्याची पूर्वतयारी सुरू असतानाच भाजपला स्वत:चेच मांजर आडवे गेले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेची लाट आली होती. त्यामुळे उत्तर प्रदेशातही भाजपला लोकसभेच्या लक्षणीय जागांवर विजय मिळाला होता. आगामी विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील जातीय, सामाजिक समीकरणे लक्षात घेऊनच भाजपला मैदानात उतरावे लागणार आहे. मायावती या एका पक्षाच्या प्रमुख असून महिला म्हणून त्यांचा योग्य सन्मान हा राखला गेलाच पाहिजे. ही बाब अन्य पक्षांतील महिला नेत्या व कार्यकर्त्यांच्या बाबतीतही तितकीच लागू होते. ही खरी भारतीय संस्कृती आहे. मायावती यांच्या राजकीय भूमिकांमध्ये जे खटकण्यासारखे आहे त्यावर टीका करायला भाजप व अन्य पक्षांना कोणीही रोखलेले नाही. मायावती ज्या दिमाखदार पद्धतीने स्वत:चे वाढदिवस साजरे करतात त्यावर घेतलेले आक्षेप, त्यांच्या वैयक्तिक संपत्तीमध्ये प्रमाणापेक्षा जास्त वाढ झाल्याचा झालेला आरोप, ताज कॉरिडॉर प्रकरण अशा अनेक मुद्द्यांवर विरोधकांनी कडक टीका केलेली होती व यापुढेही करावी. पण वैयक्तिक चारित्र्यहननाची संस्कृती भारतीय राजकारणात भिनणे हे विषारी आहे.
  • २०१४ च्या निवडणुकीत कॉंग्रेसमधील राहुल गांधी, दिग्विजयसिंग अशा वाचाळ नेत्यांच्या मूर्खपणाचा फटका कॉंग्रेसला बसला आहे. ते लोण आपल्या पक्षात येऊ नये म्हणून भाजपने काळजी घेणे आवश्यक होते. पण नरेंद्र मोदी आणि अमित शहा या जोडीच्या डोक्यावर मिरे वाटण्याचे काम हे वाचाळवीर करणार असतील तर उत्तर प्रदेशात शिरकाव मिळणे कठीण आहे.


No comments: