Tuesday, September 1, 2026

सोयीनुसार शब्द निवडण्याची स्पर्धा


स्वातंत्र्यदिनी देशाला संबोधित करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माओवादावर चर्चा करताना, सशस्त्र माओवाद्यांना संपवण्यात मिळालेल्या यशाचा उल्लेख केला आणि म्हणाले की, सशस्त्र नक्षलवादी गेले आहेत, पण मानसिक नक्षलवादी संधी शोधत आहेत. ते हिंसा आणि अराजकतेचे मार्ग शोधत आहेत. समाजाला चुकीच्या मार्गावर खेचण्यासाठी विविध डावपेच वापरले जात आहेत.


भारतीय संदर्भात, ‘माओवाद’ हा हिंसेचा समानार्थी शब्द आहे, परंतु त्याला केवळ शस्त्रांच्या संदर्भात समजून घेणे त्याच्या व्यापक व्याप्तीला मर्यादित करते. त्याचे आव्हान केवळ बंदुकांपुरते मर्यादित नाही, तर विचारांच्या माध्यमातून समाजावर हल्ला करू पाहणाºया मानसिकतेपर्यंतही विस्तारलेले आहे.

पंतप्रधानांनी दिमागी किंवा ‘मानसिक नक्षलवाद्यां’च्या मानसिकतेचा उल्लेख केला, जी मानसिकता शस्त्रांऐवजी विचारांच्या माध्यमातून समाजावर प्रभाव टाकण्याचा आणि त्याला दिशाभूल करण्याचा प्रयत्न करते. पंतप्रधानांनी ओळखण्याचा प्रयत्न केलेल्या मानसिकतेमुळे तिला संदर्भाबाहेर पाहण्याचे आणि स्वत:च्या पूर्वकल्पनांनुसार तिचा अर्थ लावण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. एखाद्या विधानाला समग्रपणे समजून घेण्याऐवजी त्यातील निवडक भागांवरून निष्कर्ष काढणे हा या प्रवृत्तीचाच एक भाग आहे.


एका विशिष्ट संदर्भातून एकच शब्द निवडून त्याला व्यापक अर्थ देणे, हे केवळ विधानाच्या मूळ हेतूला न्याय देण्यात अपयशी ठरत नाही, तर शब्दांची निवड आणि अर्थ लावणे हे स्वत:च्या सोयीनुसार एक वेगळा दृष्टिकोन कसा निर्माण करू शकते हे देखील दर्शवते. यात शंका नाही की, या प्रकरणात शब्दांची निवड आणि संदर्भाकडे दुर्लक्ष हे स्वत:च्या हेतूसाठी वापरले गेले.

जे स्वत:च्या फायद्याचे आणि हेतूचे होते, तेच ठळकपणे मांडले गेले, तर त्या हेतूत अडथळा आणू शकणारी कोणतीही गोष्ट मागे टाकली गेली. दुर्दैवाने शब्दांचे असे जाळे विणले गेले, ज्यात लोक अडकले आणि तेच संपूर्ण सत्य आहे असे मानू लागले.


ही काही पहिली घटना नाही. वैयक्तिक फायद्यासाठी, प्रसिद्धी किंवा कीर्ती मिळवण्याच्या इच्छेपोटी किंवा एखाद्या व्यक्तीची किंवा संस्थेची, अगदी देशाच्या लोकशाही व्यवस्थेची आणि नेतृत्वाची प्रतिष्ठा मलिन करण्यासाठी अशा प्रवृत्तींचा अवलंब केला गेला आहे. परंतु, एखाद्या घटनेची एक बाजू निवडकपणे मांडली गेली, ही केवळ चिंतेची बाब नाही. खरी चिंता ही आहे की, जेव्हा ही प्रक्रिया वारंवार घडते, तेव्हा हळूहळू स्वत:ची सद्सद्विवेकबुद्धीसुद्धा त्या निवडक तुकड्यांच्या आणि त्यातून तयार झालेल्या गृहितकांच्या चौकटीत काम करू लागते.

सत्य आणि अन्वयार्थ, संदर्भ आणि निष्कर्ष, वास्तव आणि रचलेली धारणा यांमधील फरक ओळखणे माणूस सोडून देतो. इथेच जमावशाही आकार घेऊ लागते, केवळ रस्त्यांवर किंवा समाजातच नव्हे, तर व्यक्तीच्या मनातही जिथे स्वत: विचार करण्याऐवजी ते पूर्वकल्पित कल्पनांचे अनुसरण करू लागतात. निवडक कथनाचे कदाचित सर्वात मोठे यश हे आहे की, ते व्यक्तींना हे जाणवू देत नाही की, त्यांचे विचार त्यांचे स्वत:चे राहिलेले नाहीत.


शब्दांना वैयक्तिक अर्थ देणे, वाक्ये संदर्भाशिवाय तोडणे आणि अर्धसत्य संपूर्ण सत्य म्हणून सादर करणे ही काही नवीन कला नाही, पण त्या काळात एखादी गोष्ट समाजाच्या सामूहिक चेतनेपर्यंत पोहोचायला वेळ लागायचा. आज माहितीचा वेग इतका प्रचंड आहे की, निवडलेला शब्द, वाक्य किंवा दृश्याचे सत्य आणि संदर्भ पडताळून पाहण्यापूर्वी त्याची हजारो किंवा लाखो वेळा पुनरावृत्ती होऊ शकते. वारंवार समोर येणारी गोष्ट हळूहळू केवळ ऐकीव माहिती न राहता, आपल्या समजुतीचा भाग बनू लागते.

म्हणूनच प्रश्न असा निर्माण होतो की, ज्या गोष्टीची आपण स्वत: कधीही तपासणी केलेली नाही, ती आपण इतक्या सहजपणे का स्वीकारतो? खरे तर, जे आपण वारंवार ऐकतो तेच अनेकदा पुरेसे ज्ञान मानले जाते. आपली हीच कमजोरी, विशिष्ट हेतूसाठी कथा रचणाºयांसाठी एक मोठी संधी बनते. त्यांना माहीत आहे की, सत्य जाणून घेण्यासाठी मूळ स्रोताकडे जाणाºया लोकांची संख्या सातत्याने कमी होत आहे. अशा परिस्थितीत एखादी गोष्ट केवळ एका विशिष्ट स्वरूपात वारंवार सादर करणे पुरेसे ठरते. हळूहळू हीच सादर केलेली माहिती सत्याची जागा घेऊ लागते.


निकोलस कॅर त्यांच्या ‘द शॅलोज’ या पुस्तकात स्पष्ट करतात की, माहिती मिळवणे जितके सोपे आणि जलद झाले आहे, तितकाच धोका वाढतो की आपण एखाद्या माहितीवर थांबून विचार करण्याऐवजी एका माहितीवरून दुसºया माहितीवर उडी मारू. आपल्याला अशा वैचारिक आणि सामाजिक वातावरणाची गरज आहे, जिथे खोटे कथानक रचणाºयांना जबाबदार धरता येईल, पण केवळ असत्य ओळखणे पुरेसे ठरणार नाही.

या प्रभावाचा सामना करण्यासाठी, आपण एक मजबूत बौद्धिक आणि सामाजिक वातावरण विकसित केले पाहिजे, जिथे तथ्ये, तर्क आणि पुराव्यांच्या आधारे सत्य ठामपणे मांडले जाऊ शकेल. नकारात्मकतेला केवळ नकारात्मकतेने उत्तर देता येत नाही, तर एका मजबूत वैचारिक प्रणालीने उत्तर द्यावे लागते, जी सत्याला त्याच्या संपूर्ण संदर्भासह आणि पुराव्यांसह समाजासमोर आणते.

No comments: