चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग भारत दौºयाच्या तयारीत आहेत. दौºयादरम्यान चीनचे राष्ट्राध्यक्ष १८ व्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होतील. जिनपिंग यांनी यापूर्वी २०१९ मध्ये शिखर परिषदेसाठी भारताला भेट दिली होती. चीनच्या राष्ट्राध्यक्षांच्या भारत दौºयादरम्यान साहजिकच दोन्ही देशांमध्ये उच्च स्तरावर चर्चा होईल. भारत-चीन सीमेवरील विशेषत: अरुणाचल प्रदेशातील अलीकडील वृत्तांमुळे संपूर्ण देश चिंतेत आहे. या बदललेल्या परिस्थितीत कोणतेही भारतीय सरकार शांतता आणि व्यापारी संबंध मजबूत करण्याच्या नावाखाली शेजारी देशाच्या अशा कुटिल कारवायांकडे सहजपणे दुर्लक्ष करू शकत नाही. नवी दिल्लीतील स्वागताच्या तयारीपेक्षा भारत-चीन सीमेवर सैन्य पूर्णपणे सुसज्ज आणि २४ तास सज्ज ठेवणे अधिक महत्त्वाचे ठरते. चीनचा इतिहासही हेच दर्शवतो की, भारताला अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.
भारत-चीन संबंधांमधील सर्वात मोठा विरोधाभास उच्च नेत्यांच्या दौºयांदरम्यान किंवा त्या सुमारास सुरू होतो. सामान्यत: जेव्हा दोन देशांमध्ये उच्चस्तरीय दौºयाचे नियोजन केले जाते, तेव्हा दोन्ही देश दौºयापूर्वी आणि दौºयादरम्यान कोणताही तणाव निर्माण होणार नाही याची खात्री करतात. तथापि, चीन नेमके याच्या उलट करतो. चीनचा इतिहास दर्शवतो की, जेव्हा जेव्हा संबंध सुधारण्यासाठी भारताचा एखादा उच्चस्तरीय नेता चीनला भेट देतो किंवा जेव्हा जेव्हा चीनचा एखादा उच्चस्तरीय नेता भारताच्या निमंत्रणावरून भारताला भेट देतो, तेव्हा चिनी सैन्य आंतरराष्ट्रीय राजनैतिकता आणि राजनैतिक शिष्टाचाराला पूर्णपणे झुगारून सीमेवर उपद्रव सुरू करते. उच्च स्तरावर संवाद, शांतता आणि व्यापारी संबंधांचा गजर होत असतानाच, चिनी सैन्य भारतीय हद्दीत जबरदस्तीने घुसखोरी करून भारतीय सैन्याशी संघर्ष करताना दिसते. हे लक्षात घेतले पाहिजे की, चिनी सैन्य पाकिस्तानी सैन्याइतके अनियंत्रित नाही, म्हणजेच ते जे काही करतात ते राष्ट्राध्यक्षांच्या मंजुरीनेच करतात.
२००३ मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या चीन दौºयादरम्यान चिनी सैन्याच्या एका तुकडीने अरुणाचल प्रदेशातील अप्पर सुबनसिरी जिल्ह्यातील असफिला भागात केवळ प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडली नाही, तर भारतीय सैनिकांच्या एका छोट्या तुकडीकडून शस्त्रेही जप्त केली. चिनी सैन्याने २०१३ मध्ये स्वत:चे पंतप्रधान ली केकियांग यांच्या भारत दौºयापूर्वी आणखी एक घृणास्पद कृत्य केले. मनमोहन सिंग सरकारच्या काळात २०१३ मध्ये चिनी पंतप्रधानांच्या भारत दौºयापूर्वी पीएलए (चीनचे सैन्य) केवळ पूर्व लडाखमध्ये (भारतीय हद्दीत) १९ किलोमीटर आत घुसले नाही, तर तिथे तंबू उभारून त्या भागावर कब्जाही केला. दोन्ही देशांचे सैन्य आमनेसामने आले आणि हा तणाव सुमारे २० दिवस चालला.
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर २०१४ मध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी भारताला भेट दिली होती. जिनपिंग यांच्या आगमनाच्या काही तास आधीच चिनी सैन्याने लडाखमध्ये घुसखोरी करून बेकायदेशीरपणे रस्ता बांधायला सुरुवात केली. येथेही दोन्ही देशांचे सैन्य जवळपास दोन आठवडे आमनेसामने उभे ठाकले होते. भारत आणि चीनचे सर्वोच्च नेते वाटाघाटी करत असताना किंवा वाटाघाटीची तयारी करत असताना चिनी सैन्याने कुटिल कारवाया केल्याची असंख्य उदाहरणे आहेत.
सप्टेंबरमध्ये चीन सीमेवर आणखी एक मोठी दुर्घटना घडवण्याची योजना आखत आहे का, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. हा प्रश्न यासाठी निर्माण होतो, कारण १२-१३ सप्टेंबर रोजी भारतात १८ वी ब्रिक्स शिखर परिषद होणार आहे. या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन भारतात येणार आहेत. चीनचे राष्ट्राध्यक्षही या परिषदेला उपस्थित राहतील, यासाठी तयारी सुरू आहे. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार भारताच्या परराष्ट्र मंत्रालयातील सूत्रांनी असे संकेत दिले आहेत की, शी जिनपिंग यांच्या भेटीची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी, त्यांच्या पथकाच्या भेटी आणि इतर तयारीवरून ते भारताला भेट देऊ शकतात असे सूचित होते.
जर हे खरे असेल, तर भारत-चीन सीमेवर दक्षता आणखी वाढवण्याची वेळ आली आहे. प्रत्येक भारतीय सीमा चौकीवर भारतीय लष्कर पूर्ण ताकदीनिशी आणि साधनसामग्रीसह तैनात करावे लागेल. दळणवळण आणि वीजपुरवठा सर्वकाळ उपलब्ध राहील याची खात्री करण्यासाठी व्यवस्था करावी लागेल. आणीबाणीच्या परिस्थितीत तत्काळ मदत पुरवण्यासाठी राखीव सैनिकांनाही सज्ज ठेवावे लागेल. दोन्ही देशांमध्ये सीमेवर शस्त्रे न वापरण्याचा करार असल्याने संघर्ष झाल्यास विशेष तयारी करावी लागेल हे उघड आहे. हिंदी चिनी भाई भाई म्हणून पाठीत खंजीर खुपसण्याची प्रवृत्ती चीनची कायम राहिलेली आहे. पंडित नेहरूंच्या काळात याचे फार मोठे नुकसान आपल्याला सहन करावे लागले होते. म्हणूनच आता आपल्याला सावधच राहावे लागेल. कधी चीन घात करेल हे सांगता येत नाही.
अशा परिस्थितीत लष्करी उपकरणे, शस्त्रे, सुधारित दळणवळण प्रणाली, २४ तास वीजपुरवठा, सुधारित रस्ते आणि मुबलक अन्नसाठा, यांसोबतच मोठे, धारदार खांबही आवश्यक आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, चिनी सैन्याच्या कुटिल कारवायांना कसे आणि कोणत्या मर्यादेपर्यंत प्रत्युत्तर द्यायचे, याबद्दल त्यांना नवी दिल्लीकडून स्पष्ट आदेश मिळायला हवेत.
No comments:
Post a Comment